माणसाच्या प्रवाही अनुभवाचे मानसशास्त्रीय आकलन: डॉ. एन.एस. डोंगरे

माणसाच्या प्रवाही अनुभवाचे मानसशास्त्रीय आकलन 

डॉ. एन. एस. डोंगरे 

मानसशास्त्र विभाग 

एस.पी.डी.एम. महाविद्यालय शिरपूर, जि. धुळे

ashay.dongare@gmail.com


  जेव्हा आपण काही करतो, तेव्हा आपण त्यात इतके मग्न होऊन जातो की, बाकीचे जग गायब झाल्यासारखे वाटते. ते करताना आपले मन भटकत नसते, हातामधील कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलेले असते, इतकेच नव्हे तर आपणाला स्वतःबद्दल देखील फारशी जाणीव उरत नाही, वेळ गायब झाल्याचा अनुभव येत असतो. आणि जेव्हा माणूस त्या अनुभवांमधून बाहेर पडतो, तेव्हा त्याला प्रत्यक्ष ‘आपण किती वेळ घालविला’ याची जाणीव होत असते. बहुदा आपण अपेक्षित वेळेपेक्षा अधिक तर कधी त्यापेक्षा काहीसा कमी वेळ घालवलेला असतो. बहुतेक लोक अशा अवस्थेचा अनुभव घेत असतात. अशा अवस्थेला काही मानसशास्त्रज्ञ ‘वर्तमानात जगणे’ म्हणतात, तर काही ‘बोधावस्था किंवा चेतनेची सर्वोच्च अवस्था म्हणतात. तर काही मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तीच्या कार्यमग्न होण्याच्या या अनुभवाला ‘प्रवाही अनुभव’ म्हटले आहे. हे नाव मिहली सिसीक्झेन्टमिहली या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने त्याच्या Flow: The Psychology of Happiness1 या जगप्रसिद्ध पुस्तकात नमूद केले. फ्लो द सायकॉलॉजी ऑफ हॅपिनेस या पुस्तकाला जगभर लोकप्रियता मिळाली नसती, तर सेलिगमन आणि मिहली सिसीक्झेन्टमिहली हे अपघाताने मित्र झाले नसते आणि सकारात्मक मानसशास्त्राची चळवळ कदाचित जन्माला आली नसती. आज सकारात्मक मानसशास्त्रात प्रवाही अनुभव ही संकल्पना मोठ्या प्रमाणात आनंदी जीवनाचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात अभ्यासली जाते. प्रवाही अनुभवाचे महत्व माणसाच्या व्यावसायिक, शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनात असाधारण असे आहे. प्रत्येक व्यवसायामधील लोक प्रवाही अनुभव घेऊ लागल्यास उच्च स्वरूपाचे आणि सकारात्मक मनुष्यबळ निर्माण होऊ शकते. ज्यामुळे कोणतीही संस्था, कार्यालय, राज्य आणि राष्ट्र विकसित होण्यात मोठे योगदान दिले जाऊ शकते. प्रस्तुत लेखाचा मुख्य उद्देश प्रवाही अनुभव हि संकल्पना समजून घेणे हा आहे. 
विशिष्ट परिस्थितीत प्रभावी अनुभवाची अवस्था घडते-जेव्हा माणूस एखाद्या आव्हानाचा सामना करतो आणि आपल्या कौशल्यांचे परीक्षण करतो. म्हणून आव्हाने आणि कौशल्य उच्च पातळीवरील असतात. ते आपल्या शारीरिक-मानसिक क्षमता आणि  कौशल्यांना त्यांच्या मर्यांदांपेक्षा अधिक ताणण्यास भाग पाडतात. आव्हाने जर कौशल्यांपेक्षा जास्त वरचढ असतील तर माणूस चिंताग्रस्त होऊ शकतो. याउलट आव्हानांपेक्षा  कौशल्ये जर अधिक वरचढ ठरली तर माणूस कंटाळतो. उदा. शाळेत हुशार विद्यार्थ्यांना जर सोपा अभ्यासक्रम मिळाला असेल तेव्हा ते शाळेत कंटाळतात. या दोन्ही परिस्थितीत माणसाला प्रवाही अनुभव येत नाही. सिसीक्झेन्टमिहली (1990) यांनी शतरंज खेळाडू, गिर्यारोहक, टेनिस खेळाडू, नर्तक, सर्जन या सारख्या हजारो लोकांच्या मुलाखती घेऊन तसेच आयुष्यातील बऱ्याच वेगवेगळ्या चर्चेतून प्रवाही अनुभवाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामधून प्रवाही अनुभव हा सार्वत्रिक अनुभव आहे आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाचे गुण समाविष्ट आहेत.. त्यापैकी काही महत्त्वाचे गुण पुढीलप्रमाणे आहेत:

  • प्रगतीविषयी उद्दिष्टांची स्पष्टता आणि तात्काळ अभिप्राय: एखाद्या स्पर्धेत माणसाने सहभाग घेतला असेल तेव्हा,  स्पर्धेत आपल्याला काय प्राप्त होणार आहे,  ते त्याला माहीत असते त्याने किती चांगले परिश्रम केले ते त्याला माहीत असते. म्हणजे तो जिंकणार आहे की, हरणार आहे, हे देखील त्याला प्रभावी अनुभवातील परिश्रमांवरून स्पष्ट होत असते. थोडक्यात त्याला भविष्यातील निकालाविषयीचा तात्काळ अभिप्राय प्रवाही अनुभव घेताना होत असतो. 
  • संपूर्ण एकाग्रता: सध्याच्या क्षणी माणूस जे काही करत आहे, त्याबद्दल त्याला संपूर्ण एकाग्रता  गरजेची असते. इतर कोणत्याही गोष्टींसाठी मनात तिळमात्र जागा असता कामा नये, तेव्हाच  प्रवाही अनुभव माणूस घेऊ शकतो.  संपूर्ण एकाग्रता ही प्रभावी अनुभवाची पूर्वअट आहे.
  • क्रिया किंवा जागृती (चेतना) विलीन केली जाते: गिटारवादक आपल्या वाद्यांसोबत विलीन होऊन जातो,  तेव्हा उत्कृष्ट संगीत निर्माण होत असते. क्रिया आणि जागृती संपूर्णतः एकमेकांमध्ये विलीन झाल्यामुळे क्रिया सहजपणे आणि आपोआप घडू लागतात.  माणुस भान हरपून त्यात मग्न होऊन जातो.  त्याला कशाचेही भान राहत नाही.  म्हणून तो प्रभावी अनुभव घेऊ शकतो. 
  • स्वतःची आत्म चेतना किंवा जागरूकता गमावणे: प्रवाही अनुभवात माणूस आपली स्वतःची आत्म चेतना गमावतो, हा एक सामान्य अनुभव असतो. परंतु मजेशीर गोष्ट म्हणजे प्रत्येक  प्रवाही अनुभवानंतर स्वतः विषयीची समज अधिक बळकट होते आणि व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी आणि आनंदी बनतो. 
  • नियंत्रणाची जाणीव: प्रवाही अनुभवात वर्तमान परिस्थितीत काय चालले आहे यावर माणसाचे संपूर्ण नियंत्रण असते, भविष्यातील यश-अपयश याबद्दल कोणतीही चिंता नसते.  म्हणून प्रभावी अनुभवाला ‘वर्तमानात जगणे’ असे देखील म्हणतात.
  • वेळ बदलणे: प्रवाही अनुभवात वेळ अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने निघून जाते, याची जाणीव माणसाला राहत नाही. हीच वेळेची गुंतवणूक माणसाला उज्वल आणि आनंददायक भविष्य निर्माण करीत असते.  त्यामुळे प्रवाही अनुभवाने लोकांचे जीवन बदलण्यास फारसा वेळ लागत नाही. 
  • प्रवाही क्रिया आंतरिकरित्या बक्षीस देणारी असते: प्रवाही अनुभवांमध्ये केली जाणारी क्रिया माणसाला आतून पारितोषिक किंवा आनंद  देणारी असते. आपण काहीतरी इच्छित गोष्ट आपल्या मनासारखी किंवा अपेक्षेपेक्षा अधिक चांगली होत असेल तर ती अधिक आनंददायक ठरते. प्रवाही अनुभवामध्ये असणारी मजेशीर गोष्ट म्हणजे वास्तविक प्रक्रियेदरम्यान भावनांची एकूण अनुपस्थिती ही होय. बहुदा स्वतःची जागरूकता अस्तित्वात नसल्यामुळे प्रवाही अनुभव भावना अनुभवण्याच्या पलीकडील अनुभूती आहे.  तथापि,  हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रवाही अनुभवाच्या प्रसंगानंतर माणसाच्या सकारात्मक भावनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. पोपोविक यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रवाही अनुभवाचे खालील प्रमाणे वर्णन केले: ”चांगली चर्चा अनेकदा एक प्रवाही अनुभवाचा अर्थबोध देते.चर्चा करताना मला स्वतःची,  सभोवतालच्या जगाची,  संपणाऱ्या वेळेची जाणीव राहत नाही. मी संभाषणात पूर्णपणे बुडून जातो, सर्व काही अगदी सहजपणे घडून जाते, ते अगदी आव्हानात्मक असले तरीही तो एक खराखुरा अनुभव असतो.  आपल्याला माहित आहे की आपण त्या ठिकाणी असतो, परंतु चर्चेच्या  दो ओघात आपण ते विसरून जातो”.  याचा विचार करता, असे वाटते की, एखादी व्यक्ती तिच्या स्वतःच्या क्रियांमध्ये पूर्णता एकाग्र होऊन विलीन होऊन जाते. म्हणजे त्या व्यक्तीला ती क्रिया करण्यावर कमी ऊर्जा खर्च करावी लागते. अशा पद्धतीने प्रवाही अनुभव हा उच्च समस्येसाठी कमी ऊर्जा समाधान म्हणून उपयोगात  आणला जाऊ  शकतो. 

प्रभावी अनुभवास कारणीभूत असलेल्या क्रियांना ‘स्वयंप्रयोजननिष्ठ’ (Autotelic) म्हटले जाते. कारण ते अंतर्निहित प्रेरणादायी आणि आनंददायक असतात आणि इतर काही अंतिम बाह्य उत्पादनाऐवजी माणसाच्या स्वतःमध्ये संपतात. संगीतकार, गीतकार, चित्रकार किंवा आणखी जे लोक आपल्या कामात प्रवाही अनुभव घेतात, ते लोक वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत नसतात; तर ते आपले काम आनंदाने करीत असतात. कारण त्यांना त्यापासून मानसिक आनंद प्राप्त होत असतो; ते स्वयंप्रयोजनाने आपल्या कामाशी एकरूप झालेले असतात. स्वयंप्रयोजननिष्ठ उपक्रमाव्यतिरिक्त सिसीक्झेन्टमिहली यांनी स्वयंप्रयोजनाविषयी  सांगितले आहे. एखादी व्यक्ती काही-बाही उद्दिष्टे साध्य  करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी काही गोष्टी करते. हे लोक जिज्ञासू असून आवडीच्या गोष्टींमध्ये रस घेऊन जगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांना वारंवार प्रवाही स्थितीत जाण्यास मदत होते. 

प्रवाही अनुभवांसाठी अनेक क्रियाकलापांमध्ये, क्रिडा, नृत्य, सर्जनशील कलांमधील सहभाग, विविध छंद, लैंगिक संबंध, सामाजकार्य, अभ्यास, वाचन आणि दररोजचे काम या सारख्या अनेक बाबींचा अंतर्भाव होतो. खरे पाहता, बरेच दैनंदिन उपक्रम प्रवाही अनुभवांशी संबंधित आहेत, जसजशी परिस्थिती अधिकाधिक जटिल होते, तशी उच्च आव्हाने आणि उच्च कौशल्यांची परिस्थिती निर्माण होते. घरातील निष्क्रिय आणि आरामदायी कामाचा फार अपवादात्मक प्रसंगी प्रभावी अनुभवाशी संबंध जोडला जातो. बऱ्याच संस्कृतीमध्ये दूरदर्शन बघण्याचा अनुभव हा प्रभावी अनुभव म्हणून विचारात घेतला जात नाही. जरी संपूर्ण जगात प्रवाही अनुभवाचे वर्णन एक सारखे केले गेले असले; तरीही सांस्कृतिक आणि परिस्थितीगत फरकांमुळे काही प्रवाही अनुभवाच्या क्रिया बदलताना दिसतात. फुरसतीच्या उपक्रमांचा बऱ्याचदा प्रवाही अनुभवाशी संबंध जोडला जातो. परंतु इराणमध्ये तसा त्याचा संबंध जोडला जात नाही. युरोपमध्ये ही जरी दुर्मिळ गोष्ट असली, तरीही पारंपारिक समाजातील लोक घरातल्या घरात असंख्य प्रवाही अनुभवाचा शोध घेतात.  उदा. संगीत साधना, नृत्य साधना, मेंहदी, गायन ह्या गोष्टी घरातल्या घरातच प्रवाही अनुभव देतात. कदाचित, घरातल्या घरात प्रवाही अनुभव घेण्यासाठी लागणारी शक्‍ती कमी असते. टीव्ही बघणे हे प्रभावी अनुभवाशी संबंधित नाही, परंतु आंधळे लोक त्याचा उपयोग प्रवाही अनुभव घेण्यासाठी करू शकतात. कारण अंध व्यक्ती टीव्ही बघू शकत नाही; परंतु माहिती ऐकून तो टीव्हीवरील माहितीच्या मानसिक प्रतिमा तयार करू शकतात. मानसिक प्रतिमा तयार करण्यातून ते प्रभावी अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की, निश्चितपणे कोणत्या क्रियांचा प्रभावी अनुभवाशी संबंध आहे आणि कोणत्या क्रियांचा नाही; हे सांगणे कठीण आहे. एखाद्या व्यक्तीसाठी केकचा तुकडा मिळविणे आव्हान असू शकते. म्हणून प्रवाही अनुभवाच्या संधी आपल्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतात. 

 प्रभावी अनुभवासाठी आवश्यक असलेली आव्हाने आणि कौशल्ये यांच्यात संतुलन साधणे गरजेचे नाही, तर दोघांनाही विस्तारित करणे आवश्यक आहे. टीव्ही पाहताना कनिष्ठ कौशल्ये, कनिष्ठ आव्हानांशी जुळत असतात, जे सहसा उदासीनतेस कारणीभूत ठरणारे आहे. दुसरीकडे, कामाच्या वेळी आपण उच्च कौशल्ये, उच्च आव्हानांसाठी उपयोगात आणल्यामुळे फुरसतीचा काळ प्रवाही अनुभव ठरतो. माणूस दिवसभराच्या कामाचा थकवा घालविण्यासाठी टीव्ही पाहतो; काम संपल्यानंतर फावल्या वेळात त्याची निवड करतो. सिसीक्झेन्टमिहली आनंद आणि सुख यांच्या दरम्यान असलेला फरक स्पष्ट करतात. प्रवाही आनंद ही अंतिम आनंदाची अवस्था असू शकते, परंतु त्यासाठी परिश्रम आणि काम करणे आवश्यक आहे. टीव्ही चे बटन सुरु करणे ही खूपच सोपी गोष्ट आहे,  म्हणून ते आपल्यासाठी खुप सुखदायक उपक्रम असू शकत नाही.

प्रवाही अनुभव हा एक लोकप्रिय विचार आणि सर्वांना अपेक्षित बनली आहे. ती नेहमी चांगली असेलच असे नाही. हे अधिक सखोल समजून घेण्यासाठी थोडा विचार करण्याची आवश्यकता आहे. खरे तर ज्या उपक्रमांमध्ये प्रवाही अनुभव आढळतो; तो नैतिक दृष्ट्या चांगला किंवा वाईट असू शकतो. उदा. जुगार, लैंगिक समागम यासारख्या गोष्टींमध्ये प्रभावी अनुभवासाठी आवश्यक असलेल्या सर्व अटी आहेत. जुगार हा खेळ आव्हानात्मक आहे आणि तो जिंकण्यासाठी उच्च स्तरीय कौशल्ये आवश्यक आहे. नैसर्गिक रित्या चांगल्या गोष्टी देखील जसे गिर्यारोहनाच्या देखील माणूस (व्यसना)अधीन होऊ शकतो. त्याशिवाय आयुष्य अस्थिर, नीरस आणि अर्थहीन वाटू शकते. सिसीक्झेन्टमिहली हे प्रभावी अनुभवांच्या धोक्याबद्दल खूपच जागृत असल्यामुळे ते लिहितात: ”प्रभावी अनुभव उत्पन्न करणारे उपक्रम माणसांवर नकारात्मक प्रभाव पाडू शकतात. जेव्हा ते माणसाच्या मनात मध्ये क्रम तयार करून मानवी अस्तित्वाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सक्षम असतात, पण जेव्हा ते व्यसनाधीन होऊ लागतात, त्यावेळी ते स्वतःचा क्रम बदलतात आणि नंतर आयुष्याच्या अस्पष्टतेचा सामना करण्यास नकार देऊ लागतात.

Comments

Popular posts from this blog

FYBA SEM II

मानसशास्त्राची ओळख

भीती जगात नाही, तर मनात आहे..